मुंबई – गेल्या आठवड्यात शेअर बाजार निर्देशांकांत मोठी घट झाल्यानंतर कालपासून परिस्थिती सुधारू लागली आहे. यामध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा अधिक वाटा असल्याचे दिसून येते.
दरम्यान ब्लू चीपपेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त वाढत असल्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये अधिक वाढ झाली आहे. बाजार बंद होताना गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 257 अंकांनी म्हणजे 0.51 टक्क्यांनी वाढून 51,039 अंकांवर बंद झाला.
त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 115 अंकांनी वाढून 15,097 अंकांवर बंद झाला. त्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप आणि स्मॉल कॅप 1.42 टक्क्यांपर्यंत वाढले.
आज रिलायन्स, ओएनजीसी, एनटीपीसी, इंडसइंड बॅंक, ऍक्सिस बॅंक, पावर ग्रीडच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मुडीज या संस्थेने पुढील वर्षी भारताचा विकास दर 13.7 टक्के पर्यंत वाढणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असल्याचे दिसून येते. पाश्चिमात्य देशांमध्ये रिझर्व बॅंकांनी भांडवल सुलभता कायम ठेवण्याचे आश्वासन दिल्यामुळे जागतीक बाजारातून सकारात्मक संदेश मिळाल्यामुळे स्थानिक बाजारातही खरेदी झाल्याचे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.
तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा क्षेत्राच्या निर्देशांकात 3.92 टक्क्यापर्यंत वाढ झाली. काल परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 28 हजार 739 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार आज खरेदी करीत असल्याचे दिसून आले. मात्र अजूनही निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार कमालीचे सावध असल्याचे दिसून आले.