मुंबई – एक फेब्रुवारीपासून म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजार निर्देशांक कमी-अधिक प्रमाणात एकतर्फी वाढत होते. गेल्या अकरा दिवसात निर्देशांकात 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र आता गुंतवणूकदार आणखी खरेदी टाळू लागले आहेत. त्यामुळे शुक्रवारी खरेदी-विक्रीच्या लाटानंतर निर्देशांक कालच्या पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 12 अंकांनी वाढून 51,544 अंकांवर बंद झाला. दरम्यानच्या काळामध्ये सेन्सेक्समध्ये 543 अंकांचे चढ-उतार झाले. विस्तरित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 10 अंकांनी कमी होऊन 15,163 अंकांवर बंद झाला.
सध्याच्या अस्थिर परिस्थितीतही आयसीआयसीआय बॅंक, ऍक्सिस बॅंक, इन्फोसिस, एचडीएफसी बॅंक, बजाज फिन्सर्व, स्टेट बॅंकेच्या शेअरच्या भावात सुधारणा झाली. तर आयटीसी, ओएनजीसी, सन फार्मा, भारती एअरटेल, टायटन या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
सकाळी निर्देशांकात चांगली वाढ झाली होती. मात्र दुपारच्या सत्रामध्ये खरेदी कमी आणि विक्री जास्त झाली. युरोपीयन शेअर बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळेही गुंतवणूकदारानी पोजिशन घेतल्या नाहीत. आशियाई शेअर बाजार मात्र आज बंद होते.