मुंबई – केंद्र सरकारने सन संसदेत 2021-22 वर्षाचे सर्वेक्षण सादर केले आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षाचा म्हणजे 2021 -22 या वर्षाचा विकास दर 9.2 टक्के राहील असे गृहीत धरण्यात आले आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार आशावादी झाले. सोमवारी जोरदार खरेदी होऊन शेअर निर्देशांक वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 813 अंकांनी वाढून 58,014 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 237 अंकांनी म्हणजे 1.39 टक्क्यांनी वाढून 17,339 अंकांवर बंद झाला. यामुळे कंपन्यांच्या बाजार मुल्यात एकाच दिवसात 3.33 लाख कोटी रुपयाची भर पडली. जवळजवळ सर्व क्षेत्राचे निर्देशांक आज उंचावले. टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फिन्सर्व, इन्फोसिस, स्टेट बॅंक या कंपन्यांचे शेअर वाढले. इंडसइंड बॅंक, कोटक बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
आगामी वर्षात म्हणजे 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर आठ ते साडेआठ टक्के राहील असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी विकास दर उणे 7.3 टक्के इतका भरला होता. अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असतानाच ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने कमी होत असल्यामुळे गुंतवणूकदार कमालीचे आशावादी झाले असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
सकाळी युरोप, हॉंगकॉंग आणि जपानच्या शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आले. चीन, आणि दक्षिण कोरियाचे शेअर बाजार सुटीमुळे बंद आहेत. शेअर बाजारात सकारात्मक वातावरण असले तरी परदेशी संस्थागगत गुंतणूकदार मात्र गुंतवणूक काढून घेत असल्याचे वातावरण आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारानी तब्बल 5,045 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
टाटा मोटर्स आगेकूच करणार
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, उत्पादन आधारित अनुदान इत्यादी तरतुदी केल्या जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इक्विटी 99 या संस्थेने शेअरच्या किमती वाढण्याची शक्यता असलेल्या 5 कंपन्यांची यादी तयार केली आहे. यामध्ये टाटा मोटर्स, करुर वैश्य बॅंक, बीसीएल इंडस्ट्री, ऑन मोबाइल ग्लोबल, मेडपल्स हेल्थ सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश आहे. या संस्थेने म्हटले आहे की, टाटा मोटर्स शेअर सध्या 497 रुपयांवर आहे, तो नजीकच्या भविष्यात 750 रुपयांपर्यंत वाढू शकतो.