मुंबई – गेल्या तीन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत होते. काल महागाई कमी झाल्याची आणि औद्योगिक उत्पादन वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली. या कारणामुळे काही गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्याने शेअर बाजारातचे निर्देशांक शुक्रवारी अर्धा टक्क्यापर्यंत वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 303 अंकांनी वाढून 60,261 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 98 अंकांनी म्हणजे 0.55 टक्क्यांनी वाढून 17,956 अंकांवर बंद झाला. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस आणि इन्फोसिस या कंपन्यासह टाटा स्टील, इंडसइंड बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बॅंक, मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांक वाढले. मात्र टायटन, नेस्ले, लार्सन अँड ट्युब्रो, ऍक्सिस बॅंक, आयटीसी, एशियन पेंट्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
इन्फोसिस कंपनीने काल जाहीर केलेल्या ताळेबंदात नफा अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 13.4 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर कंपनीची उलाढाल वाढणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केल्यामुळे आज या कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ झाली. जिओची वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, भारतातील आणि अमेरिकेतील महागाई वेगाने कमी होत आहे. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादन वाढल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर आगामी काळाबाबत गुंतवणूकदार आशावादी झाले आहेत.
जागतिक बाजारातूनही आज सकारात्मक संदेश आले. वॉल स्ट्रीट, युरोप, जपान, दक्षिण कोरिया, चीन, हॉंगकॉंग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. टीसीएस आणि इन्फोसिस या कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्यामुळे इतर कंपन्याही आगामी काळात तिसऱ्या तिमाहीचे चांगले ताळेबंद जाहीर करतील असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे शेअर बाजारात आशावाद निर्माण झाला आहे.