मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे तीन दिवसानंतर भारतीय शेअर बाजार निर्देशांकात थोडीफार वाढ झाली. गुरुवारी धातू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्यामुळे निर्देशांकात वाढ होऊ शकली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 209 अंकांनी वाढून 52,653 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 69 अंकांनी वाढून 15,778 अंकावर बंद झाला.
टाटा स्टील, बजाज फिन्सर्व, स्टेट बॅंक, सन फार्मा, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ नोंदली गेली. मात्र मारुती, पावर ग्रीड, बजाज ऑटो, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरण झाली.
जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर भारतातील धातू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. वाहन, ग्राहक वस्तू, औषधी क्षेत्राकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले.
विशेष म्हणजे मोठ्या कंपन्यापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरची जास्त खरेदी झाल्यामुळे मिड कॅप व स्मॉल कॅप जास्त प्रमाणात वाढले. युरोप आणि आशिया खंडातून शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत असल्याचे दिसून आल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही खरेदी झाल्याचे दिसून आले.