मुंबई – अमेरिकेने आगामी काळात मवाळ पतधोरणाची संकेत दिल्यानंतर अमेरिकेसह जागतिक शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर कायम आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले.
शुक्रवारी बाजार बंद होताना शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 712 अंकांनी वाढून 57,570 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 228 अंकांनी म्हणजे 1.35 टक्क्यांनी वाढून 17,158 अंकावर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी या कंपन्याबरोबर टाटा स्टील, सन फार्मा, बजाज फिन्सर्व, इंडसइंड बॅंक, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, विप्रो या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना चांगला आधार मिळाला. मात्र डॉक्टर रेड्डीज, कोटक महिंद्रा बॅंक, स्टेट बॅंक, आयटीसी. ऍक्सिस बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक व्हि के विजयकुमार यांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या आठ दिवसापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी कमी -अधिक प्रमाणात खरेदी केली आहे. त्याचबरोबर दरम्यानच्या काळामध्ये भारतातील कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. भारताची स्थूल अर्थव्यवस्था इतर देशापेक्षा चांगली आहे. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 1,637 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली. त्यामुळे भारतामध्ये आर्थिक मंदी निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे काही विश्लेषण करणाऱ्या संस्थांनी सांगितल्यामुळे जोरदार खरेदी होऊन निर्देशांक वाढत आहेत.
अमेरिका, युरोप आणि दक्षिण कोरियातून सकारात्मक संदेश आल्यानंतर भारतीय शेअर बाजारामध्ये खरेदी झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 1,637 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली होती. काल भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ दीड टक्क्यांनी वाढले होते आजही त्यामध्ये एक टक्क्याची भर पडली आहे.