मुंबई – देशांतर्गत आणि परकीय नकारात्मक घडामोडींमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक दोन टक्क्यांनी कोसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,170 अंकांनी म्हणजे 1.96 टक्क्यांनी कोसळून 58,465 अंकांवर बंद झाला.
सात महिन्यात प्रथमच सेन्सेक्स एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 348 अंकांनी कोसळून 17,416 अंकांवर बंद झाला.
भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्याचे बोलले जात असतानाच सरकारने कृषी क्षेत्रातील सुधारणा करणारे तीन कायदे परत घेतले. याचा सरकारच्या आर्थिक सुधारणावर परिणाम होईल असे गुंतवणूकदारांना वाटते. गेल्या आठवड्यात पेटीएम कंपनीचा भारतातील सर्वात मोठा आयपीओ जारी झाला होता. मात्र गुंतवणूकदारांनी याला अजिबात प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विस्ताराबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. आजही पेटीएम कंपनीचा शेअर जवळजवळ 13 टक्क्यांनी कोसळला.
रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी सौदी अरेबियातील आर्मको कंपनीला 15 अब्ज डॉलरचे भागभांडवल विकणार होती. मात्र ही चर्चा फिसकटली आहे. या कारणामुळे शेअर बाजारात सोमवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले तरी भारती एरटेल, एशियन पेंट्स, पावर ग्रिड या कंपन्यांचे शेअर वाढले. आज फक्त धातू आणि दूरसंचार क्षेत्राचे निर्देशांक वाढले. तर रिऍल्टी, ऊर्जा, ग्राहक वस्तू, वाहन, तेल आणि नैसर्गिक वायू, वित्तीय क्षेत्रांचे निर्देशांक कोसळले. मिड कॅप व स्मॉल कॅप तीन टक्क्यांपर्यत कमी झाल्याचे दिसून आले. परदेशी संस्था गुंतवणूकदारांनी आज विक्री केली असल्याचे दिसून आले. या संदर्भातील आकडेवारी उद्या जाहीर होणार आहे.
शेअर कोसळलेल्या कंपन्या
रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, एनटीपीसी, टायटन, स्टेट बॅंक.