मुंबई – इतर देशापेक्षा भारताची स्थूल अर्थव्यवस्था मजबूत असतानाच अमेरिकेने अपेक्षेपेक्षा कमी व्याजदर वाढ केल्यामुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी चालूच आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक उंचावले. आता हे निर्देशांक करानापूर्व पातळीकडे घोडदौड करीत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 545 अंकांनी वाढवून 58,116 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी एक टक्क्याने म्हणजे 182 अंकांनी वाढून 17,340 अंकावर बंद झाला. टाटा मोटर्स, महिंद्रा या कंपन्याबरोबरच रिलायन्स, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, पावर ग्रिड, कोटक बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, एनटीपीसी, स्टेट बॅंक, ऍक्सिस बॅंक आणि टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ नोंदली गेली. मात्र सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, टीसीएस, एचडीएफसी आणि एशियन पेंट्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
आज खरेदी वाढल्यामुळे मिडकॅप आणि स्मॉल कॅप दीड टक्यापर्यंत वाढले. निफ्टी ऑटो 3.3 टक्क्यांनी तर निफ्टी पीएसबी 1.5 टक्क्यांनी वाढले. निफ्टी फार्मामध्ये मात्र 0.08 टक्क्यांची घट नोंदली गेली. अमेरिका आणि युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले होते मात्र आशिया खंडातील शहर निर्देशांक वाढले होते. सध्याची एकूण परिस्थिती पाहता राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये 17,000 ते 17,500 दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी ही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे निर्माण झाली असल्याचे समजले जात आहे. अमेरिकेने माफक व्याजदर वाढ केल्यानंतर परदेशी संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. 146 कंपन्यांचे शेअर वाहून 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर आहेत तर 37 कंपन्यांचे शेअर 52 आठवड्याच्या निचांकी पातळीवर आहे. आज 360 कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागले.