मुंबई – भारतीय शेअर बाजाराने सलग चौथ्या दिवशी जोरदार तेजी कायम राखली. बीएसई सेन्सेक्स १,५०८.९१ अंकांनी (१.९६%) उसळून ७८,५५३.२० वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ४१४.४५ अंकांनी (१.७७%) वधारून २३,८५१.६५ वर पोहोचला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी एका दिवसात ४.४९ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला. बँकिंग, तेल-वायू आणि टेलिकॉम क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसली, तर स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांमध्ये ०.५% वाढ नोंदली गेली.
तज्ज्ञांचे मत आहे की, परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा भारतीय बाजारात खरेदी सुरू केली आहे. शिवाय, भारत-अमेरिका व्यापार कराराच्या शक्यतेने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. बीएसईवरील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४१५ लाख कोटींवरून ४१९.४९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
दरम्यान, आज सेन्सेक्समधील ३० पैकी २८ शेअर्स तेजीत बंद झाले. इटर्नल (४.३७%), आयसीआयसीआय बँक (३.६८%), भारती एअरटेल, सन फार्मा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (३.२८% ते ३.६८%) यांनी आघाडी घेतली. फक्त टेक महिंद्रा (०.२४%) आणि मारुति सुझुकी (०.०४%) घसरले.
आज बीएसईवर ४,१०६ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यापैकी २,४२९ शेअर्स वधारले, १,५२० घसरले, तर १५७ स्थिर राहिले. ८३ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ३३ शेअर्सनी नीचांक नोंदवला.