मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या बऱ्याच उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मंगळवारी नफेखोरी केली. काल राष्ट्रीय उत्पन्न कमी झाल्याचे आकडेवारी जाहीर झाल्याचाही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला.
मंगळवारी बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सात अंकांनी कमी होऊन 15,574 अंकावर बंद झाला. गेल्या सात दिवसांपासून निफ्टी वाढून विक्रमी पातळीवर गेला होता. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दोन अंकाने कमी होऊन 51,934 अंकांवर बंद झाला.
आयसीआयसीआय बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, ऍक्सिस बॅंक, आयटीसी, कोटक बॅंक, पावर ग्रीड, इन्फोसिस या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. तर बजाज फायनान्स, स्टेट बॅंक, एचडीएफसी, बजाज ऑटो, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात तीन टक्केपर्यंत वाढ झाली.
रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येऊनही निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. आजही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या भावात बरीच वाढ झाल्यामुळे निर्देशांकाची मोठी हानी टळली.
मे महिन्यामध्ये बऱ्याच राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा निर्देशांक कमी भरला आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार लघु पल्ल्यात तरी सावध झाले आहेत. सरलेल्या वर्षाचा विकासदर उणे 7.3 टक्के इतका भरला आहे.
त्यामुळे गुंतवणूकदार काही दिवस विचार करण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या दिवशी रुपयाच्या मूल्यात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.