नवी दिल्ली – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या कमालीच्या उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारात बरीच नफेखोरी होऊन निर्देशांकात काही प्रमाणात घट नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 49 अंकांनी कमी होऊन 61,716 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.32 टक्क्यांनी म्हणजे 58 अंकांनी कमी होऊन 18,418 अंकावर बंद झाला.
गेल्या सात दिवसापासून शेअर बाजार निर्देशांक एकतर्फी वाढत होते. आज नफेखोरीमुळे आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, पावर ग्रिड या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. मात्र या नफेखोरीचा वातावरणातही टेक महिंद्रा, एल अँड टी, बजाज फिन्सर्व, कोटक बॅंक, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली.
इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले असले तरी रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मात्र खरेदी चालूच राहिली. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यास प्राधान्य दिले असल्याचे एम के सिक्युरिटीजचे विश्लेषक एस रंगनाथन यांनी सांगितले.
काल परदेशी संस्थागत गुंतवणूदारांनी 512 कोटी रूपयाच्या शेअरची खरेदी केली असल्याची माहीती शेअर बाजारानी दिली आहे. रुपयाचे मुल्य सध्या कमी आहे. हे मुल्य आणखी कमी झाल्यास या गुंतवणूकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक रुपयाचे मुल्य स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.