मुंबई, दि.19- गेल्या पाच दिवसापासून भारतातील शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले होते. शुक्रवारी जागतिक शेअर बाजारात मंदी असूनही भारतात मात्र जोरदार खरेदी होऊन निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1.3 म्हणजे 641 अंकांनी वाढून 49,858 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 186 अंकांनी वाढून 14,744 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बॅंक, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र टेक महिंद्रा, बजाज ऑटो, एल अँड टी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
याबाबत रिलायन्स सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, पाच दिवसापासून शेअर बाजारात घट होत असल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्याचे दिसून आले.
भारत सरकारच्या रोख्यावरील परतावा बराच कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी केली असल्याचे दिसून आले. ऊर्जा, धातू, औषधी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र रिऍल्टी, भांडवली वस्तू क्षेत्राची पिछेहाट झाली.
मिड कॅप व स्मॉल कॅप दिड टक्क्यापर्यंत वाढले. करोना रुग्ण वाढत असल्याबद्दल गुंतवणूकदारांना चिंता आहे. मात्र निर्देशांक बरेच कमी असल्यामुळे काही गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी करीत आहेत.