मुंबई – शेअर बाजार निर्देशांक सध्या उच्च पातळीवर आहेत. स्थूल अर्थव्यवस्थेसंबंधात सकारात्मक आकडेवारी जाहीर होऊनही त्याकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. खरेदी-विक्रीच्या लाटा नंतर शुक्रवारी निर्देशांक कालच्या पातळीवर स्थिर राहिले.
जागतिक शेअर बाजारात महागाईच्या शक्यतेमुळे नकारात्मक वातावरण कायम आहे. त्यामुळे भारतातील गुंतवणूकदारांनी खरेदी टाळली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र आता विक्री सुरू केली असून काल या गुंतवणूकदारांनी 1,390 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 12 अंकांनी कमी होऊन 61,223 अंकांवर बंद झाला. विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 2 अंकाने कमी होऊन 18,255 अंकांवर बंद झाला.
रुपयाच्या मूल्यामध्ये आज तब्बल 26 पैशांची घट होऊन रुपयाचा दर 74.16 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. यामुळे काही गुंतवणूकदारांनी विक्री केली असल्याचे दिसून आले. आगामी काळात अमेरिकेचे व्याजदर वाढणार असल्यामुळे रुपयाच्या मुल्यांवर दबाव येऊ शकतो असे बोलले जाते. त्यामुळे रुपया स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
एशियन पेंट्स, ऍक्सिस बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, महिंद्रा, एचडीएफसी, एअरटेल या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. तर टीसीएस, इन्फोसीस, एल अँड टी, एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली. घाऊक महागाईचा दर काही प्रमाणात कमी झाला आहे. त्याचबरोबर डिसेंबरमधील निर्यात 40 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र या आकडेवाडीकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला.