मुंबई – मंगळवारी शेअर बाजार निर्देशांक 2.30 टक्क्यांनी वाढल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 6 लाख कोटी रुपयांनी वाढले. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार एकाच दिवसात मालामाल झाले.
आजच्या घडामोडींमुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजार मुल्य एकाच दिवसात 6 लाख 2001 कोटी रुपयांनी वाढून 204 लाख 77 हजार 472 कोटी रुपये इतके झाले. करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे काही आठवड्यापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते.
याचा फायदा दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यांनी घेतला असल्याचे दिसून येते. जागतिक बाजारातूनही मंगळवारी सकारात्मक संदेश आले. माहिती तंत्रज्ञान, धातू, आरोग्य, ग्राहक वस्तू, वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावात मंगळवारी वाढ झाली.