मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येत असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार नफेखोरी करीत असल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात माफक घट नोंदली गेली. बाजार बंद होताना गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 230 अंकांनी कमी होऊन 61,750 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 65 अंकांनी म्हणजे 0.36 टक्क्यांनी कमी होऊन 18,343 अंकावर बंद झाला.
टायटन, महिंद्रा, मारुती, एचडीएफसी, डॉक्टर रेड्डीज, बजाज फायनान्स, इन्फोसिस, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर लार्सन ऍण्ड ट्युब्रो, पावर ग्रिड, आयसीआयसीआय बॅंक, भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकाची मोठी हानी टळली. दक्षिण कोरिया, जपान, चीन, हॉंगकॉंग युरोप, अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्यामुळे सकाळपासूनच भारतीय शेअर बाजारामध्ये वातावरण मंद होते.
यातच परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा भारतीय शेअर बाजारात विक्री सुरू केल्याचे वातावरण असून बुधवारी या गुंतवणूकदारानी 386 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदार सावध राहिले. काही किरकोळ गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे निर्देशांक शेवटपर्यंत घसरत गेले.
मुंबई शेअर बाजाराचा मिडिकॅप 0.33 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.27 टक्क्याने कमी झाला. आजच्या विक्रीचा फटका ग्राहक वस्तू, वाहन, ऊर्जा क्षेत्रांना जास्त बसला. दूरसंचार आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे या क्षेत्राचे निर्देशांक काही प्रमाणात वाढण्यास मदत झाली.
व्याज दरवाढीचे वातावरण
अमेरिका पुन्हा व्याज दरात वाढ करून महागाई कमी करण्याचा प्रयत्न करेल असे वातावरण आता निर्माण झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून जागतिक शेअर बाजारात पुन्हा विक्रीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होताना दिसून येत आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक इतर देशाच्या तुलनेत उच्च पातळीवर आहेत.