मुंबई – सध्या सर्व शेअर बाजाराचे निर्देशांकात खालच्या पातळीवर आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकांत वाढ झाली. त्यातच जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे निर्देशाकांना आधार मिळाला.
आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 632 अंकांनी वाढून 54,884 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 182 अंकानी वाढून 16,352 अंकांवर बंद झाला.
आज 2152 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1099 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 119 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. मिड कॅपमध्ये आणि स्मॉल कॅपमध्ये 1 टक्क्याची वाढ झाली.
माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली असल्याचे दिसून आले. आजच्या कामकाजाबाबत रेलिगेअरचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यानंतर त्या प्रमाणात भारतीय शेअर बाजारासह इतर देशांच्या निर्देशांकामध्ये वाढ होत आहे.
भारतामध्ये पुढील आठवड्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची आणि वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या आधारावर निर्देशांकांना काही प्रमाणात दिशा मिळू शकणार आहे. आठवड्याच्या पातळीवर सेन्सेक्स 558 अंकांनी तर निफ्टी 86 अंकांनी वाढला. टेक महिंद्रा, इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स, महिंद्रा, इन्फोसिस, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
तर एनटीपीसी, एअरटेल, पावर ग्रीड, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, नेस्ले या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. आता काही प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे वातावरण बाजारात निर्माण झाले असल्याचे काही ब्रोकर्सनी सांगितले. मात्र काल या गुंतवणूकदारांनी 1,597 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याचे दिसून आले.