मुंबई – शेअर बाजार निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गेल्या आठवड्यात नफेखोरी होऊन निर्देशांकात घट झाली होती. सोमवारी शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटानंतर निर्देशांकात काही प्रमाणात वाढ झाली.
आयसीआयसीआय बॅंकेने चांगला ताळेबंद जाहीर केल्यामुळे निर्देशांकाला आधार मिळाला. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 145 अंकांनी वाढून 60,967 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 10 अंकांनी वाढून 18,125 अंकांवर बंद झाला.
बॅंकांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे बॅंक निफ्टी दोन टक्क्यांनी वाढून 41,192 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, वाहन, रिऍल्टी, धातू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने चांगला ताळेबंद जाहीर केल्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या भावात भक्कम वाढ झाली होती. मात्र नंतर नफेखोरी होऊन या कंपनीच्या शेअरचा भाव एक टक्क्याने कमी झाला. बजाज फिन्सर्व, बजाज ऑटो, मारुती, एचसीएल टेक्नॉलॉजी, एशियन पेंट्स कंपन्यांच्या शेअरच्या भावात दोन टक्क्यांपर्यंत घट झाली.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप आज 1.6 टक्क्यापर्यंत कमी झाले. मुख्य निर्देशांक काही प्रमाणात वाढले असले तरी एकूण शेअर बाजारात नकारात्मक वातावरण कायम होते. त्यामुळे गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे.