मुंबई – शेअर बाजार निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर आहेत असे बरेच विश्लेषक सांगत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांकडून शेअरची खरेदी चालू होत आहे. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर घोड-दौड करीत आहेत.
मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 247 अंकांनी म्हणजे 0.50 टक्क्यांनी उसळुन 49,517 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 78 अंकांनी वाढून 14,563 अंकांवर बंद झाला.
बरेच विश्लेषक करेक्शनचे भीती व्यक्त करीत असूनही शेअर बाजाराचा निर्देशांक वाढत आहेत, याची कारणमीमांसा करताना रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, सकाळी बऱ्याच सांशक गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे निर्देशांकात घट झाली होती. रिझर्व्ह बॅंकेने निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्याचे म्हटले आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करून दुपारी बॅंकांच्या शेअरची खरेदी झाली.
वाहन विक्री वाढली असल्यामुळे वाहन कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. त्याचबरोबर कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करतील असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीतही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी होत असल्यामुळे निर्देशांकांना भक्कम आधार मिळत आहे.
सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी 3,138 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जागतिक बाजारातूनही आज कमी अधिक प्रमाणात सकारात्मक संदेश आल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी केली असल्याचे ते म्हणाले.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक, एअरटेल या निर्देशांकाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. त्याचबरोबर स्टेट बॅंक, आयटीसी, ऍक्सिस बॅंक, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाली. मात्र एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, टायटन, कोटक बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.