मुंबई – जागतिक पातळीवर करोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुपयाचे मूल्य कमी होत आहे. त्याचबरोबर सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमुळे फारसा परिणाम होणार नाही, उलट तूट वाढेल, असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे बुधवारी बरीच विक्री होऊन सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकांत घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 185 अंकांनी कमी होऊन 52,249 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 66 अंकानी कमी होऊन 15,748 अंकांवर बंद झाला. कोटक बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, टेक महिंद्रा, बजाज ऑटो, ऍक्सिस बॅंक, महिंद्रा, स्टेट बॅंक, मारुती या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. तर पावर ग्रीड, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, डॉक्टर रेड्डीज, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमुळे सरकारची तूट आणखी 70 हजार कोटी रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे इतर शेअर बाजारातूनही नकारात्मक संदेश आल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही.
धातू, तेल आणि नैसर्गिक वायू, दूरसंचार, बॅंकिंग आणि वाहन क्षेत्राचे निर्देशांक 1.35 टक्क्यांपर्यंत कमी झाले.
तर आरोग्य, ग्राहक वस्तू क्षेत्राच्या निर्देशांकात थोडीफार वाढ झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच असून गुंतवणूकदारांनी 1,658 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. परकीय गुंतवणूकदारांना परदेशातून जास्त परतावा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.