मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या विक्रमी पातळीवर असूनही गुंतवणूकदारांकडून एकतर्फी खरेदी चालूच आहे. त्यामुळे निर्देशांक गुरुवारी नव्या विक्रमी पातळीवर विराजमान झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून 54,492 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.22 टक्क्यांनी म्हणजे 35 अंकांनी वाढून 16,294 या विक्रमी पातळीवर विराजमान झाला.
आजच्या त्याचे नेतृत्व रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक, टाटा स्टील, एअरटेल या कंपन्यांनी केले. मात्र स्टेट बॅंक, इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. बाजारातील घडामोडी बाबत रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे आज निर्देशांकात भर पडू शकली. ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्या गुंतवणूकदारांना नफादायक वाटत आहेत.
मात्र आज फक्त मोठ्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. छोट्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा मिड कॅप व स्मॉल कॅप बरेच घसरले. गेल्या तीन दिवसापसून या क्षेत्रात विक्री चालू आहे. जागतिक बाजारातून संमिश्र संदेश येत असले तरी भारतीय बाजारात मात्र खरेदीचे वातावरण अजूनही चालू असल्याचे दिसून येत आहे. रिझर्व बॅंकेचे पतधोरण उद्या जाहीर होणार असल्यामुळे बॅंकांच्या शेअरकडे आज गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले.