मुंबई – महागाई वाढण्याचे शक्यतेमुळे गेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजार निर्देशांकात मोठी घट झाली होती. दरम्यानच्या काळात काही कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्याचबरोबर स्थूल अर्थव्यवस्थेसंबंधात सकारात्मक आकडेवारी जाहीर होत असल्यामुळे आज बऱ्याच गुंतवणूकदारांनी भरपूर खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक सव्वा टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 767 अंकांनी वाढून 60,686 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 229 अंकांनी म्हणजे 1.28 टक्क्यांनी वाढून 18,102 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स पुन्हा 60 हजार अंकाच्या वर आणि निफ्टी 18 हजार अंकाच्या वर गेल्याबद्दल गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले.
टेक महिंद्रा, एचडीएफसी, इन्फोसिस, बजाज फिन्सर्व, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ झाली. मात्र बजाज ऑटो, टाटा स्टील, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
जिआजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, महागाईमुळे निर्माण झालेले अनिश्चित वातावरण आज काही प्रमाणात कमी झाले. आता गुंतवणूकदार ताळेबंद, वाढता विकासदर इत्यादीकडे लक्ष केंद्रित करीत असल्याचे दिसून आले. जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण असूनही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दरम्यान क्रुडच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे आज दिसून आले.