नवी दिल्ली – बऱ्याच आठवड्यांच्या संदिग्ध वातावरणानंतर मंगळवारी शेअर बाजारात तेजीचे वातावरण खात्रीने परतले. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शेअरची बरीच खरेदी झाल्यानंतर आजही गुंतवणूकदारानी जोरदार खरेदी केली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 2.30 टक्क्यानी म्हणजे 1,128 अंकांनी वाढून 50,136 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 337 अंकांनी वाढून 14,845 अंकांवर बंद झाला. एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एचसीएल टेक, एनटीपीसी, नस्ले, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
अचानक निर्माण झालेल्या तेजीबद्दल बोलताना कोटक सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख रश्मिक ओझा यांनी सांगितले की, या आठवड्यात स्थूल अर्थव्यवस्थेबाबत एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. अमेरिकेतील दहा वर्षाच्या कर्ज रोख्यावरील परतावा वाढला असतानाच भारतातील कर्जरोख्यावरील परतावा मात्र स्थिर आहे. त्यामुळे भारतातील गुंतवणूक नफादायक राहिला असे जागतीक गुंतवणूकदारांना वाटत आहे.
त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढल्याचे वातावरण आहे. गेल्या महिन्यात भारतीय शेअर बाजारात बरेच करेक्शन झाले आहे. वाढणारी महागाई आणि वाढणाऱ्या करोना रुग्नाचा विचार करुन गुंतवणूकदारांनी विक्री केली होती.
मात्र आता यापेक्षा निर्देशांक कमी पातळीवर जाणार नाहीत असे बरेच गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे खरेदी वाढू लागली आहे. त्याचबरोबर नव्या वर्षातील पहिल्या तिमाहीचा विचार करून काही संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. मात्र महागाई आणि सरकारी रोख्यांवरील परतावा वाढला तर गुंतवणूकदार सावध होऊ शकतात.