मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार कमालीचे सावध झाले आहेत. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा येत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये बरीच विक्री झाल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 189 अंकांनी कमी होऊन 52,735 अंकावर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 45 अंकांनी म्हणजे 0.29 टक्क्यांनी कमी होऊन 15,814 अंकावर बंद झाला.
रुपया घसरून डॉलर वधारत असल्यामुळे परकीय संस्थागत गुंतवणूकदार विक्री करण्याच्या मानसिकतेत आहेत. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 678 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. मुख्य निर्देशांक जरी कमी झाले तरी छोट्या कंपन्याच्या शेअरच्या भावावर आधारीत मिड कॅप आणि स्मॉल कॅप 0.46 टक्क्यांपर्यंत वाढले.
रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबरच एचडीएफसी टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे मुख्य निर्देशांकावर परिणाम झाला. त्याचबरोबर अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, या कंपन्यांनाही विक्रीचा मारा सहन करावा लागला.
मात्र अशा परिस्थितीतही टाटा स्टील, टेक महिंद्रा, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. आगामी काळात काही सरकारी बॅंकांच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे बरेच गुंतवणूकदार सरकारी बॅंकांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करीत असल्याचे वातावरण आहे. उर्जा, भांडवली वस्तू, तंत्रज्ञान, माहीती तंत्रज्ञान, दूरसंचार, वीज या क्षेत्राचे निर्देशांक 0.80 टक्क्यापर्यंत कमी झाले. तर धातू, आरोग्य क्षेत्रांचे निर्देशांक वाढले.
पॅकेजचा परिणाम नाही
दुपारच्या सत्रात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करोनाचा ज्या क्षेत्रावर परिणाम झाला आहे त्या क्षेत्रांना काही सवलती जाहीर केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने कर्जासाठी हमीचा समावेश आहे. त्यामुळे गुंतवणूकदार फारसे उत्साहीत झाले नाहीत.
उलट दुपारच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रापेक्षा जास्त विक्री होऊन निर्देशांक कमी झाले. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये उद्योग क्षेत्राला थेट असे काहीही मिळालेले नाही. त्याचबरोबर ग्राहकांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी पॅकेजमध्ये कसलीही तरतूद नाही.