मुंबई – गेल्या पंधरवड्यामध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी मंगळवारी नफा काढून घेतला. यामुळे शेअर बाजार निर्देशांकांत घट नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठ्या 30 कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित सेन्सेक्स मंगळवारी 435 अंकांनी कमी होऊन 60,176 अंकांवर बंद झाला. मात्र तरीही हा निर्देशांक 60,000 अंकाच्या पुढे असल्याबद्दल गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 96 अंकांनी म्हणजे 0.53 टक्क्यांनी घसरून 17,957 अंकांवर बंद झाला.
नफेखोरीचा जोर एवढा बाळाला होता की एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या भावात नफ्यासाठी आज घट झाली असल्याचे दिसून आले. बजाज फिन्सर्व, कोटक बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांनाही नफेखोरीचा फटका बसला. मात्र अशा परिस्थितीतही एनटीपीसी पावर ग्रीड, आयटीसी, टायटन, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात चार टक्क्यापर्यंत वाढ झाली असल्याचे दिसून आले.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 17 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर 13 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. आज काही प्रमाणात नफेखोरी झाली असली तरी बाजारातील वातावरण अजूनही सकारात्मक आहे. सध्या गुंतवणूकदाराचे छोट्या कंपन्यांच्या शेअरकडे जास्त लक्ष असल्याचे दिसून येते. जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की रशिया- युक्रेन युद्ध अजूनही सुरू आहे. विविध देशातील महागाई वाढत आहे. या कारणामुळे मध्यम पल्ल्यात शेअर बाजारात अस्थिरता रेंगाळण्याची शक्यता आहे.
पुढील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्या आधारावर काही गुंतवणूकदार खरेदी-विक्रीचे निर्णय घेऊ शकतात. नफेखोरीसाठी गुंतवणूकदारांनी बॅंका, वित्तीय संस्था, रिऍल्टी, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची निवड केली. तर धातू, ग्राहक वस्तू इत्यादी कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली असल्याचे दिसून आले. चीन, जपान, दक्षिण कोरियातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. मात्र युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. दरम्यान परदेशी संस्था गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील खरेदी चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी 1,150 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.