मुंबई – सोमवारी सकाळी शेअर बाजार निर्देशांक उंचावले होते. मात्र नंतर घाऊक महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर विक्री होऊन शेअर निर्देशांकांना ही पातळी कायम राखता आली नाही. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 32 अंकांनी वाढून 60,718 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 6 अंकांनी वाढून 18,109 अंकांवर बंद झाला.
सकाळी जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येऊनही भारतीय शेअर बाजारात चांगली खरेदी झाली होती. मात्र नंतर विक्री झाली. पावर ग्रीड, आयटीसी, एशियन पेंट्स, नस्ले, कोटक बॅंकेच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. महिंद्रा, बजाज ऑटो, स्टेट बॅंकेच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. आनंद राठी या ब्रोकरेज संस्थेचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, गुंतवणूकदार आगामी काळात सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता आहे.