मुंबई – महागाई रोखण्यासाठी व रुपया सावरण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने सकाळी आपल्या मुख्य व्याजदरात तब्बल 0.50 टक्क्यांची वाढ केल्या नंतर शेअर बाजारात बऱ्यापैकी खरेदी होऊ निर्देशांक वाढले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 89 अंकांनी वाढून 58, 387 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 15 अंकांनी वाढून 17,397 अंकावर बंद झाला.
रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणे अपेक्षित होते. त्यामुळे या अगोदरच गुंतवणूकदारांनी या व्याजदर वाढीचा हिशोब केला आहे. महागाई कमी करणे आणि रुपया सावरणे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दीर्घटनेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ करूनही गुंतवणूदारांनी खरेदी केले असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
आता व्याजदर करोनापूर्व पातळीवर म्हणजे 5.40% वर गेला आहे. अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बॅंक, भारती एअरटेल, पावर ग्रीड, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. महिंद्रा, मारुती, रिलायन्स, इंडसइंड बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
दक्षिण कोरिया, चीन, जपान, हॉंगकॉंग या आशियाई देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजारात मात्र खरेदी मंद होती.
परदेशी गुंतवणूकदाराकडून खरेदी
अमेरिका, युरोप चीनसह विविध देशात मंदी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार मध्यम ते दीर्घ पल्ल्यात चांगला परतावा देतील असे परदेशी गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसापासून या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात बरीच खरेदी केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वाढण्यास मदत मिळत आहे. गुरुवारी या गुंतवणूकदारांनी 1,474 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्याचबरोबर कच्च्या तेलाचे दर कमी होऊन सध्या 94 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात खरेदीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.