नवी दिल्ली – महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वातावरण आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असून आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकांत मोठी घट नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 314 अंकांनी कमी होऊन 60,008 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 100 अंकांनी म्हणजे 0.56 टक्क्यांनी कमी होऊन 17,898 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, ऍक्सिस बॅंक, भारती एअरटेल, टायटन, महिंद्रा या कंपन्यांना सपाटून मार खावा लागला. मात्र या विक्रीच्या वातावरणातही मारुती, एशियन पेंट्स, पावर ग्रिड, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. त्यामुळे निर्देशांकाची मोठी हानी टळली.
महागाई वाढत असल्यामुळे विविध देशाच्या रिझर्व बॅंका भांडवल सुलभता कमी करून व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे आगामी काळामध्ये शेअर निर्देशांकात काही प्रमाणात करेक्शन होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जागतिक बाजारातही नकारात्मक वातावरण होते. शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेतली जात असल्यामुळे आगामी काळात डॉलर मजबूत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोने भाव खाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
डॉलर वधारत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल 560 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. जर जागतीक पातळीवरील महगाई वाढून डॉलर आणखी वाढला तर हे गुंवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेण्याची शक्यता आहे. त्याचा रुपयाच्या मुल्यावर नकारात्मक परिणाम संभवतो.