मुख्यमंत्री फडणवीस आणि लेखी हमी नाही, यावर भाजपा ठाम,
ठरलं तेच करा तोच आमचा प्रस्ताव असल्याचा शिवसेनेचा दावा
मुंबई : सत्ता वाटपाबाबत लोखी हमी देणार नाही आणि मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड नाही अशी प्रत्यक्षात ताठर भूमिका घेत शिवसेनेशी चर्चेची द्वारे अद्याप खुली आहेत, अशी मांडणी मंगळवारी भाजपाने केली. तर दोन्ही पक्ष एकत्र आल्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जर शिवसेना सत्तेवर आली तर शेतकरऱ्यांचे सातबारा कोरे करू असे सुचक विधान करत वेगळ्या समीकरणाचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले.
राज्यात भाजपा सेना महायुतीला बहुमताचे दान राज्यातील मतदारांनी दिले. मात्र, सत्तेत समान वाटा देण्याचे आश्वासन भाजपाने लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री अडीच वर्ष आणि खात्यांचे समान वाटप अशा मागणीवर शिवसेना अडून बसली आहे. मतमोजणीला सुमारे दोन आठवडे उलटूनही सत्ता स्थापनेचा पेच सुटू शकला नाही. भाजपातील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चेच्या टेबलवर सर्व सर्व मतभेदांचे निराकरण होऊ शकते. मात्र, भाजपा कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्रीपद देणार नाही तसेच सत्तेतील वाट्याची लेखी हमी देण्याची भाजपाची बिलकूल इच्छा नसल्याचे सांगितले त्यामुळे ही कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे.
त्याचवेळी आज दुपारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठरलेली गोष्ट नाकारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही, जे ठरलं तोच प्रस्ताव आहे. नवा प्रस्ताव काय पाठवायचा,असे ठामपणे सांगितले.
सरकार स्थापन करण्यासंदर्भातील भाजपाची बैठक झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, संपूर्ण भाजपाचं नेतृत्त्व देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंशी आहे. तेच मुख्यमंत्री होणार असून, अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करू, पण शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्या प्रस्तावासाठी भाजपाचं दरवाजे खुले असून, प्रस्ताव आल्यास विचार करू. पाटील यांच्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करू हे भाजपाचं म्हणणं फार समंजस निवेदन आहे. त्यांनी खुप उशीरा ते केले. ही भूमिका आधी घेतली असती तर सत्ता स्थापनेचा निर्णय लांबला नसता. पण, शिवसेनेकडून प्रस्ताव आला नाही, असे कसे म्हणता येईल. शिवसेना आजही भूमिकेवर ठाम आहे. लोकसभेला जे ठरले तोच प्रस्ताव आहे. ठरल्या प्रमाणे होईल आणि ठरल्या प्रमाणेच करा, एक काडीही जास्त नको, ही भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी आधीपासूनच घेतली आहे. त्यात तडजोड करणार नाही. चर्चा आमच्यामुळं थांबलेली नाही. ठरलेली गोष्ट नाकारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. आम्ही कधीही शब्द बदलले नाही. मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा करणार हे भाजपानं लिहून पाठवावे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
… तर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा : ठाकरे
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जनतेच्या आशिर्वादाने पुन्हा शिवसेना सत्तेत आल्यास सर्वात आधी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन त्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन मराठवाड्यात ओल्या दुष्काळग्रस्त भागाची मंगळवारी पाहणी करताना उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. ठाकरे म्हणाले, जनतेच्या आशिर्वादाने सरकार आलं तर शिवसेना सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार तसेच त्यांचा सातबाराही कोरा करणार. अतिवृष्टीमुळे खरीप हातचा गेला असून रब्बी पिकांच्या तयारीसाठी सरकारने केवळ कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना हजार रुपयांची तत्काळ मदत द्यावी.