दिरंगाई होत असल्याची केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांची बैठकीनंतर कबुली
पुणे – मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पूर्ण अनुदान देण्याचे मान्य केल्यानंतरही कामकाज रखडले आहे. जायका बॅंका कर्ज देणार असल्याने त्यांनी घालून दिलेल्या अटींचे पालन झाले नाही, तर विलंब होतो, अशी कबुली देत याविषयी केंद्र सरकारबरोबर एक बैठक दिल्ली येथे आणि राज्यसरकार बरोबर मुंबई येथे एक बैठक घेण्यात येईल. या प्रकल्पासाठी दिरंगाई टाळून हा प्रकल्प वेळच्या वेळी मार्गी लावण्यात येणार असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे “दिशा’ समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी केंद्रीयमंत्री जावडेकर म्हणाले, मैलावर प्रकिया न करता नद्यांमध्ये मिळसत असल्याने देशातील सर्व नद्या अस्वच्छ झाल्या आहेत. त्याअनुषंगाने गेल्या 5 वर्षात खूप मोठी झेप घेतली. तरी अजून पूर्ण व्हायला वेळ लागतो. देशभर मैला शुद्धीकरण प्रकल्प होणे आवश्यक आहे. महापालिकांनी एसटीपी प्लॅन्ट उभारावा, हा त्यासाठीचा पहिला उपाय आहे. हे करण्यासाठी सर्व संस्थांनी आराखडा तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यात मध्यान्ह योजनेचा चांगला परिणाम झाला आहे. स्तनदा माता आणि गर्भवतींना आहार देण्यात येतो. याचा चांगला परिणाम झाला आहे. तीव्र कुपोषित मुले तीन वर्षांत 347 वरून 151 इतकी संख्या कमी झाली. त्याहीपेक्षा चांगले यश पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये दिसून आले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
कचरा व्यवस्थापन आवश्यक
घनकचरा हा सर्व शहरांसह खेड्यांमध्येही प्रश्न बनला आहे. खडकवासला रस्त्यावर किरकीटवाडीपासून प्रत्येक गावाभोवती कचरा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पडलेला दिसतो. त्यामुळे घनकचऱ्यासंबंधी वन आणि पर्यावरण विभागामार्फत नवे आदेश देणार आहे. यामध्ये तीन हजार पेक्षाजास्त वस्ती असणाऱ्या सर्व गावांना कचरा व्यवस्थापन हे नियमित करावे लागेल. कचरा गोळा करणे, वर्गीकरण करणे हे दोन्ही गोष्टी कराव्या लागणार आहेत, असेही जावडेकर यांनी सांगितले.