मुंबई : यंदाच्या वर्षी चांगला पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेला असला तरी त्यापही राज्यात पावसाला सुरवात झाली नाही. देशात ६ दिवस आधी हजेरी लावलेल्या मान्सूनने राज्याला मात्र हुलकावणीच दिली आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे गोवा किनारपट्टीपासून महाराष्ट्रात दखल होण्याची आशा होती. मात्र आता मान्सूनची वाटचाल थांबली असून महाराष्ट्र्रात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे.
साधारणतः ५ जून पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होतो मात्र यंदा मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. मात्र हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण , पालघर ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली आहे. होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील मान्सूनचे आगमन फार लांबले नाही. ५ जूनपर्यंत मान्सून तळकोकणात हजर होतो. मात्र केरळ आणि कर्नाटकात मान्सूनने हजेरी लावल्यानंतर तो महाराष्ट्रातही दाखल होईल अशी अपेक्षा होती. मात्र मान्सूनची प्रगती थांबल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शिवाय मान्सूनचे आगमन खूप लांबले नसून आपण अद्यापही नियमित वेळेच्या जवळ आहोत. असे त्यांनी म्हंटले आहे.
शेतकरी चिंतेत
मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील अनेक भागात शेतीसाठी जमीन तयार करण्याची कामे सुरु असून बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय खारीप हंगाम लांबण्याची देखील चिंता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या वर्षी मान्सूनपूर्व पावसाने देखील दडी मारली आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी देखील शेतकऱ्यांना ७० ते १०० टक्के पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असा सल्ला दिला आहे.