नवी दिल्ली – केंद्र सरकारने 13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर काही प्रमाणात मर्यादा आणल्या आहेत. मात्र अशा परिस्थितीतही गहू निर्यातीला काही अटीवर परवानगी दिलेली आहे. परिणाम 13 मे नंतर भारतातून 15 लाख टन गव्हाची निर्यात झाली आहे.
13 मे पूर्वी ज्या निर्यातदारांनी गहू निर्यातीसाठी कंत्राटे केली आहेत, अशा निर्यातदारांना निर्यातीची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वाणिज्य मंत्रालय आवश्यक ती मदत करीत आहे. त्यामुळेच 13 में नंतर 15 लाख टन गव्हाच्या निर्यातीसाठीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
परकीय व्यापार महासंचालनालयाचे संचालक संतोष कुमार सारंग यांनी सांगितले की 13 मे पूर्वी ज्यांचे व्यवहार झाले आहेत, त्यांना पुढील कामासाठी आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. सरलेल्या वर्षामध्ये भारताने 70 लाख टन गहू निर्यात केला आहे. या गव्हाची किंमत दोन अब्ज डॉलर इतकी आहे. त्यातील बहुतांश गहू बांगला देशाने खरेदी केला असल्याचे त्यांनी सांगितले.