नवी दिल्ली – पंजाबच्या माझा प्रांतात प्रभावशाली असणाऱ्या किसान मजदूर संघर्ष समितीवर दिल्लीतील बाह्य वळण मार्गावर ट्रॅक्टर संचलन नेल्याबद्दल टीका करण्यात येत आहे. शेतकरी संघटनांची शिखर संघटना असणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने चार मार्गावरून ट्रॅक्टर मोर्चा नेण्यासाठी करार केला. मात्र तरीही ही समिती बाह्य वळण मार्गावरून मोर्चा नेण्यास आग्रही होती.
केएमएससीने शेतकऱ्यांची दिशाभूल करून हिंसाचार भडकावल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. शेतकरी नेते दर्शन पाल म्हणाले, केएमएससी या गोंधळाला जबाबदार आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या अन्य संघटनांच्या नेत्यांनीही केएमएससीचा निषेध केला आहे.
केवळ केएमएससीच मार्ग बदलण्यास जबाबदार आहे. त्याच संघटनेने राजधानीत शिरण्याची घोषणा केली होती. या संघटनेचा पंजाबमधील आंदोलन करणाऱ्या 32 संघटनांत समावेश नाही. आमची निदर्शने सुरू झाल्यानंतर अनेक दिवसांनी त्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू केले आहे, असे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीरसिंग राजेवाल यांनी सांगितले.
दीड दशकांपुर्वीच किसान संघर्ष समितीपासून फारकत घेतली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अन्य सदस्यांसह पन्नू यांनी किसान संघर्ष समितीची स्थापना केली. मात्र मतभेद झाल्यानंतर पन्नू त्यातून 2007मध्ये बाहेर पडले, असे केएमएससीचे अध्यक्ष सतनामसिंग पन्नू यांनी सांगितले.
कलप्रित पन्नू म्हणाले, केएमएससी, पंजाबी अभिनेता दीप सिध्दू आणि गॅंगस्टर आणि कार्यकर्ता लख्खा सिधाना यांनी शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानला बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. केएमएससीने जाणीवपूर्वक संचलनाचा मार्ग बदलला आणि निदर्शकांना लाल किल्ल्यावर पोहोचू दिले. तेथे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याला केएमएससीच जबाबदार आहे.
अन्य शेतकरी संघटनांच्या निर्णयांपासून केएमएससीने स्वत:ला बाजूला काढले आहे. समाज माध्यमांत त्यांनी हा निर्णय कळवला आहे. केएमएससीच्या बाह्य वळण मार्गावरून सुरू असणारे संचलन एका शेतकरी संघटनेने आणि एका भगवा ध्वज घेतलेल्या संघटनेने लाल किल्ल्याकडे वळवले.
केएमएससीचे सरचिटणीस स्वर्णसिंग पांधेर म्हणाले, आम्ही रिंग रोडच्या दिशेने निघालो, त्यावेळी आम्ही तीन ते चार बॅरिकेड्स तोडले. पोलिसांनी त्यावेळी अश्रुधुराचा वापर केला. निदर्शकांना अन्न देण्यासाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या दिल्लीतील रहिवाशांचे आम्ही आभारी आहोत. संचलनानंतर दिल्लीच्या सीमांकडे लगेच परतणाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत.
आम्ही व्हिडिओ मेसेजमधून काही बाह्य शक्ती आगळीक करण्याची शक्यता असल्याचे जनजागरण आम्ही आधीच केले होते. लाल किल्ल्याकडे वळण्याचा आमच्या संघटनेचा कोणताही हेतू नव्हता. बाह्य वळण मार्गावर शांततेत संचलन नेण्याची आमची योजना होती. काही समाजकंटकांनी शेतकऱ्यांना भडकावले.
पण त्यांना तेथे जायचे असेल तर तेथे जाऊन ते काय करणार होते? आमचा राष्ट्रध्वज तेथे फडकत होता. आम्ही त्याचा अनादर करू शकत नाही. केवळ तेथे निशाण साहीब फडकावण्यात आला. आम्हाला काही शेतकरी तेथे गेल्याचे समजले तेंव्हा आम्ही त्यांना परतण्याचे आव्हान केले आणि तेथून त्यांना परत आणले. एका छोट्या गोष्टीने निदर्शनाची बेअब्रू झाली, असे ते म्हणाले.