मी नातीच्या घरी गेले आणि नातीने मला घट्ट मिठी मारून हसून स्वागत केले. हे नेहमीचंच आहे. लाडकं कोकरू, दुधावरची साय, गुंडूगुंडू पिल्लूला धरून मी गोल गोल फिरली. आणि मस्तपैकी दोन तीन सेल्फी काढून आपल्या व्हॉट्सऍपच्या “डीपी’वर लावून पण टाकला! नातीबरोबर माझं नात अगदी दिलखुलास आहे. अगदी शुभंकरोतीपासून लुंगीडान्स गाण्यावर मनमुक्त नाच करण्या इतकं छान! आज माझ्या नातीला आवडतात म्हणून पुरणपोळ्या भरपूर तूप लावून आणल्या होत्या आणि त्याच बरोबर कटाची आमटी, भात, भजी, बटाटा, कुरड्या, पापड्या, चटणी, कोशिंबीर सारे साग्रसंगीत आणले होते. नात एकदम खूश झाली…
मला माझं लहानपण आणि माझी आजी आठवली… माझ्या लहानपणी जेव्हा माझी आजी पुण्याहून येई तेव्हा आम्ही सर्व भावंडे एकदम खूश होत. आजी होतीच तशी प्रेमळ, हवी हवीशी वाटणारी आणि सुंदरही. ती अलिबागला येई तेव्हा ती भले मोठे बोचके (गाठोडे) बांधून घेऊन येई त्याकाळी ट्रंकासुद्धा नव्हत्या पण ते गाठोडे म्हणजे जादूची पोतडीच असे आणि आम्हां भावंडांसाठी पर्वणी! येताना ती प्रत्येकासाठी काही ना काही घेऊन येई. लेकीसाठी म्हणजे माझ्या आईसाठी लुगडे, खण, वडिलांसाठी धोतर जोडी, आम्हा सर्व भावंडांना कपडे, खेळणी, आंबे, इतर फळे, मेंदी, बांगड्या, टिकल्या, बिंदी, पायातले, कानातले, रिबिनी, वगैरे खूपखूप आणत असे आणि वेगवेगळ्या मिठाया, केक आणखीही खूप काय काय आणे, आणि सर्वात महत्त्वाचे तिची माया, ममता, प्रेम, आणि लाड त्या गाठोड्यात आणि आजीमध्ये ओतप्रोत अगदी पुरेपूर भरलेले असत.
एकदा गंमतच झाली. काहीतरी खोड्या काढल्याने किंवा चूक केल्याने माझ्या आईने माझ्या दोन छोट्या भावंडांना शिक्षा म्हणून दाराबाहेर उभे केले आणि तेव्हड्यात आजी आली. ती नेहमी अचानकच यायची. “अतिथी देवो भवं’ असं म्हणण्याचा काळ होता तो. आजकाल सारखं फोन करून या किंवा आम्हाला वेळ नाही, असं सांगायचा किंवा म्हण ण्याचा काळ नव्हता. तर सांगायचा मुद्दा असाकी, माझी आजी आली हे सांगण्यासाठी माझी भावंडे उड्या मारून, आजी आली, आजी आली…असे म्हणून दार वाजवून आईला हाक मारू लागली. पण आईला वाटले घरात घ्यावे म्हणून ते असं करताहेत म्हणून तिने दुर्लक्ष केले; पण आजीने जेव्हा “शांते दार उघड’ म्हणून हाक दिली तेव्हा आईने दार उघडले. मग भावंडांनी संधी साधली आणि ती दोघेही आजीबरोबर पटकन घरात आली आणि वातावरण आनंदाने, हसण्याने आणि जल्लोषाने भरून गेले. आजीचं येणं आमच्यासाठी पर्वणी असे. यथावकाश माझे लग्न झाले आणि योगायोगाने मला सासरही पुण्याचेच मिळाले. आजीचा सहवास, लाड आणि कौतुक भरभरून मिळाले. लग्नानंतरचे बाराही सण आजीने थाटामाटाने केले. माझे डोहाळे पुरवले. मी आई झाले. आजीने पतवंडे पाहिली. काही वर्षांनी मी आजी झाले आणि आजीच्या पावलावर पाय टाकून नातवंडांचे पुरेपूर लाड करता येतील तेव्हडे भरभरून करते प्रेम,माया, आपलेपणा देते. आम्ही आजी-नात कमी आमचं मैत्रीचंच नात जास्त घट्ट झालं.
शब्दगंधा