नवी दिल्ली – जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यामुळे भारताला विविध क्षेत्रात महागाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलाद उद्योगांनी पोलादाच्या किमतीत प्रति टनाला पाच हजार रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. पोलादाचा वापर विविध क्षेत्रात केला जातो. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये या महागाईचा शिरकाव होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलाद उद्योगातील सूत्रानी यासंदर्भात सांगितले की पाच हजार रुपयाची केलेली दरवाढ पुरेशी नाही. आगामी काळामध्ये आणखी दरवाढ करण्याची गरज पडणार आहे. पोलाद उद्योगाने दिलेल्या माहितीनुसार हॉट रोल्ड कॉईलची किंमत आता 66 हजार रुपये प्रती टन झाली आहे.
टीएमटी बारची किंमत 65 हजार रुपये प्रति टन इतकी झाली आहे. या दोन प्रकारच्या पोलादाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बांधकाम, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू इत्यादी क्षेत्रावर परिणाम होणार आहे.
यामुळे वाहन, घरे आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किती आगामी काळात वाढतील. पोलाद उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण पुरवठा साखळी बिघडली आहे. त्यामुळे सर्व कच्च्या मालाच्या दरात वाढ होत आहे. त्या प्रमाणात आम्हाला दरवाढ करणे अपरिहार्य आहे.
पोलाद उद्योगाला मोठ्या प्रमाणात कोळसा लागतो. हा कोळसा 85 टक्के इतका आयात केला जातो. मात्र जागतिक बाजारात कोळशाचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे कोळशाच्या किंमती वाढल्या असल्याचे टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी व्ही नरेंद्रन यांनी सांगितले. ते म्हणाले के रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश केवळ पोलाद निर्यात करत नाही तर पोलादासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्यात करतात. या युद्धामुळे ही निर्यात पूर्णपणे थांबले आहे.