इस्लामपूर – रविवारी दिवसभर जनता कर्फ्युला इस्लामपूरच्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला खरा.. पण सोमवारी सकाळी वेगळे चित्र पहायला मिळाले. सकाळच्या जुन्या गणेश भाजी मंडईत प्रचंड गर्दी करत जनता कर्फ्युवर पाणी फिरले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले अन् संवेदनशील असणाऱ्या इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूरच्या माझ्या बांधवांनो आपल्या घरीच सुरक्षित रहा ! असा संदेश दिला आहे.
त्यांनी संदेशात म्हटले आहे की ; इस्लामपूरच्या भाजी मंडईमध्ये सकाळी लोकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहिले. माझ्या बांधवांनो, कोरोना पसरू नये म्हणून सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. जमावाने एकत्र आल्यास कोरोना पसरण्याची शक्यता वाढते. मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की तुम्ही आपल्या घरीच सुरक्षित रहा.
कलम १४४ असो वा महाराष्ट्र लॉकडाउन करण्याचा निर्णय असो, हे सरकारने जनतेच्या स्वास्थ्यासाठी घेतलेले निर्णय आहे. जीवन एकदाच मिळते आणि ते अमूल्य आहे याचे भान ठेवूयात. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. इस्लामपूरातील नागरिकांनी याबाबत अधिक दक्षता घ्यायला हवी.