सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला
नागपूर : करोना व्हायरसच्या महामारीमुळे देश संकटात सापडला आहे. या काळात आपल्या सर्वांना एकांतात राहून देशसेवा करायची आहे. सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका. सध्या सकंटाचा काळ आहे, त्यामुळे माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहा. आपापल्या समाजाला दिशा देण्याचे काम प्रत्येकाने नागरिक म्हणून करावे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ते नागपुरात बोलत होते.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सध्या एकूण 40 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. काही लोक नियमांचे पालन करताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवेदन सादर केले. यावेळी एकांतात बसणे हीच राष्ट्रसेवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भागवत म्हणाले, भय क्रोधापासून दूर राहणे, आवश्यक आहे. कारण, घाबरल्याने शत्रूचे मनोबल वाढते. तर, क्रोधाने तुमचे स्वास्थ बिघडेल. त्यामुळे माथी भडकावणाऱ्यांपासून दूर राहावे. प्रत्येक समाजाच्या समजूतदार लोकांनी पुढे येऊन आपापल्या समाजाला दिशा देण्याचे करायला हवे. या काळात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करुन गर्दी करू नये. संघाचे सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पालघरमध्ये दोन सांधूंची हत्या झाली ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे भागवत म्हणाले. अशा घटनांमध्ये पोलिसांची भूमिका काय असावी हे महत्त्वाचे आहे. येत्या 28 एप्रिलला या साधूंना श्रद्धाजली देण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.