मुंबई, – राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना व वस्त्यांना महसुली गावांचा दर्जा देण्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.
या संदर्भात सदस्य राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात बोलत होते. औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील 5 वाडी/तांड्याना महसुली गावांचा दर्जा देण्याचे प्रस्ताव परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील आगरगाव व येरणगाव या महसुली गावाच्या बाहेर असलेल्या तांड्याना तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील बेल्हारा व दहेगाव या 300 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली गावांचा दर्जा देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
कोकणातील डोंगराळ भागात ज्या धनगरवाड्या आहेत त्यांना सुविधा देण्यासाठी लोकसंख्येचे निकष बदलण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहितीही थोरात यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री सुरेश धस, रामदास कदम, गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.
महसूल बुडविल्याप्रकरणी चौकशी
औरंगाबाद ग्रामीणचे तत्कालीन तहसीलदार यांनी कुळ जमीन विक्री व्यवहारास परवानगी देताना नियमांचे उल्लंघन करून खरेदीदारांकडून जमिनीच्या रेडीरेकनर दरानुसार निम्मी रक्कम वसूल केली नसल्यामुळे शासनाचा तीन कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणी तत्कालीन तहसीलदारांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. यासंदर्भात सदस्य अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रकरणी महिनाभरात दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
12 संस्थांची चौकशी सुरू
नागपूर शहरात एक रुपया लीजवर शासनाकडून सामाजिक कामांसाठी जागा घेऊन ज्या बारा संस्थांनी शासकीय जमिनीचे भाडे थकविले आहे. त्यानुसार संबंधित संस्थांबाबत भाडेपट्ट्यातील अटी व शर्तीनुसार जमीन वापराबाबत तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यांची उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच मुंबईतील गोरक्षक मंडळाने गाय चरणसाठी जी शासकीय जमीन घेतली होती त्यामध्ये गैरप्रकार झाले असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.