– दिलीप पुराणिक, सातारा
पाकिस्तानातील कराची या शहरात आजदेखील 600 ते 700 मराठी कुटूंबे रहातात, हे ऐकून तुमच्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटेल. एकत्रित लोकसंख्या लक्षात घेतली तर ही लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास आहे. गायकवाड जाधव, भोसले, दुपटे, जगताप, राजपूत, खरात, कवठेकर, गोस्वामी अशा आडनावाची माणसे आहेत.
गेल्या 75 वर्षात, स्वातंत्र्य मिळाल्या पासून काराचीतल्या मराठी माणसांचा आणि आपला फारसा संबंध आला नाही. झालेच असेल तर त्यांचेकडे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. कराचीतील निवडक संपन्न मराठी कुटुंब त्यांच्या पुण्या-मुंबईच्या नातेवाईकांच्या संपर्कात होते. त्यामुळेच आपली मराठी संस्कृती आपल्या पाठिंब्याविना टिकवून ठेवण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुरु होती. पण अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच या दोन्ही देशांमधील एक सांस्कृतिक पूल बांधण्याचं काम “स्वप्न स्टडीज’ने स्वीकारलं आणि त्याला प्रचंड यश आलं. कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता केवळ नि:स्वार्थ आणि सेवाभावी वृत्तीने आणि मराठी भाषेवरच्या प्रेमाखातर हा प्रकल्प आकार घेतो आहे. महाराष्ट्रातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठी प्रेमी या प्रकल्पात सहभागी होत आहेत.
नोकरी व्यवसायानिमित्त यातील काही कुटुंबे परदेशात देखील स्थिरावत आहेत. महेंद्र गायकवाड आणि राजेश अटकेकर हे दुबईमध्ये स्थायिक झाले आहेत. धनवंती तोडकर या अमेरिकेत आहेत. अनिता गड्डम या मलेशिया येथे स्थायिक झाल्या आहेत. गायकवाड कुटुंबातील काही सदस्य अमेरिका आणि कॅनडा येथे वसले आहेत. रतन तुळशीराम दुपटे हे कराचीतील अतिशय बुद्धिमान व्यक्ती, अमेरिकेतील जॉर्जिया युनिव्हर्सिटी मधून त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि गणित या तीनही विषयात PHD संपादन केली. ते अनेक वर्ष जॉर्जिया युनिव्हर्सिटी मध्ये गणित या विभागाचे विभाप्रमुख होते.
विजय जाधव यांनी 1980 मध्ये कराचीतील सुप्रसिद्ध डी. जे. सायन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी आपले MBA चे शिक्षण जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठातून मधून पूर्ण केले. त्यांनी अमेरिकेतील मायक्रसॉफ्ट, SAP अशा मान्यवर कंपन्यांमध्ये काम केले. रमेश जाधव कालांतराने भारतात स्थायिक झाले. त्याची मुलगी एअर इंडियामध्ये पायलट आहे. या सर्व कुटुंबांचा कराचीतील मराठी माणसांना खूप अभिमान आहे.
लीला प्रकाश या कराची शहरात गणपती मठाच्या व्यवस्थापिका आहेत. त्यांची दोन्ही मुले इंजिनियर असून खासगी कंपनीमध्ये काम करतात. मराठी लोक आजही नियमितपणे गणपती मठ मंदिर किंवा म्हसोबा मंदिरात श्रद्धेने पूजा करतात. ही दोन्ही मंदिरे मराठी मंडळींच्या ताब्यात आहेत. रोहित काकड हा कराचीतील सुप्रसिद्ध संगीतकार असून मराठी तरुण असून त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे. फकिरा गायकवाड हे बॅंक कर्मचारी आहेत.
राजेश नाईक आणि त्यांचा परिवार गणपतीच्या सुंदर आणि सुबक मुर्ती बनवितात. कराची महाराष्ट्र पांचायतला गणपती उत्सवात गणेश मूर्ती भेट देतात. ही मूर्तीकला त्यांचे वडील कृष्णा नाईक यांच्याकडून त्यांना वारसाने मिळाली. कराची शहरात गणेश मूर्ती तयार करण्याची परंपरा श्री कृष्णा नाईक यांनी सुरू केली. पूर्वी मुंबई या शहरातून कराचीला गणेश मूर्ती पाठविल्या जात असत.
विजय नाईक यांचे बंधु मुकेश नाईक हे एका पंचतारांकित हॉटेल मध्ये शेफ आहेत. त्यांनी बनविलेले सूप हे कराची शहरात अतिशय प्रसिद्ध आहे. अनर्जित राजपूत हेसुद्धा मराठी शेफ आहेत. संजय जाधव हे राष्ट्रीयकृत बॅंकेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. विनोद जाधव देखील दुबई इस्लामिक बॅंकेत कर्मचारी आहेत.
विजय जाधव हे एका नामवंत आर्किटेक्चर कंपनीत काम करतात. देवानंद सांडेकर एका शिपिंग कंपनीत जहाजाचे कॅप्टन आहेत. त्यांची मुले हिंदी आणि संस्कृत हे विषय देखील शिकतात. रवी गायकवाड हे कराची इलेक्ट्रिकल कॉर्पोरेशनमध्ये अधिकारी आहेत. संगीता गायकवाड या शासकीय शाळेतील निवृत्त शिक्षिका आहेत. मोहन गायकवाड हे कराचीतील मराठी समाजात अतिशय लोकप्रिय आणि सन्माननीय व्यक्ती होते. सर्व समाजातील पूजाअर्चा धार्मिक कार्य त्यांच्या हस्ते केले जात असे.
कराचीमध्ये पाक शेटिंग हाउस या नावाने दुपटे यांचे टेलरिंग शॉप प्रसिद्ध होते. कराचीतील मान्यवर लोक त्यांच्याकडे आपले कपडे शिवत असत. याकूब अली खान, झुल्फिकार अली भुट्टो, ऍटलास होंडाचे मालक युसुफ खिलजी यासारखे कराचीतील सुप्रसिद्ध आणि श्रीमंत लोक त्यांचे ग्राहक होते.
पाकिस्तानमधील मराठी महिला गणपती, दिवाळी आणि होळी यासारखे सण अतिशय उत्साहाने साजरे करतात. पण त्यांना महाराष्ट्रातील चैत्रगौर, हरतालिका, वटसावित्री, संक्रांत हळदीकुंकू समारंभ, मंगळागौरी या सणांची खूप उत्सुकता आहे. तसेच नवरात्रौत्सवात घागरी फुंकणे खेळ खेळणे झिम्मा, फुगडी, सूप नाचवणे, पिंगा घालणे या मराठमोळ्या कार्यक्रमासंबंधी खूप आकर्षण आणि उत्सुकता आहे.तसेच महाराष्ट्रातील भोंडला, भुलाबाई याबद्दलसुद्धा त्यांना जाणून घ्यायचे आहे. आपल्या मातृभमीच्या अनेक बाबींची माहिती करून घेण्याची प्रचंड उत्सुकता त्यांच्या मनात आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक घरात मराठी पद्धतीने पुरण पोळी, करंजी, लाडू, मोदक हे खास महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ प्रत्येक सणाला मोठ्या उत्साहाने महिला तयार करतात. सुमारे 75 वर्षांचा मराठी संस्कृतीशी दुरावा असतानादेखील हे त्यांना कसे साध्य होते? हे विचार करण्यासारखे आहे. एकीकडे आपली संस्कृती विसरत चाललेली तरुणाई आणि दुसरीकडे आपल्या परंपरेबद्दल प्रचंड ओढ, हे अचंबित करणारे आहे. चोहीकडे उर्दू भाषेचा प्रभाव असताना आपले मराठी पण कायम टिकावीण्यासाठी धडपडणारी ही कराचीतील मंडळी बघितली की, आनंदच होतो.
येथील लोक अतिशय धार्मिक आणि देवभोळ्या वृत्तीची आहेत. आमच्या रविवारच्या मराठी वर्गात यावर अनेक शंका प्रश्न विचारल्या जातात. मराठी संस्कृतीची नव्याने जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रात प्रेताची आरती करण्याची पद्धत आहे का? प्रत्येक धार्मिक विधीला बळी देण्याची गरज आहे का? लग्न पद्धती, सुतक, वृद्धि या रूढी बाबत सुध्धा त्यांना प्रचंड उत्सुकता आणीं प्रश्न त्याच्या मनात आहेत. एकंदरीतच त्यांना मराठी आणि मराठी संस्कृती याबद्दल खूप माहिती करून घ्यायची ओढ आहे.
कराचीतील मराठी समाजात विविध जातींचे समाजबांधव आहेत. त्यांना जेजुरीचा खंडोबा, पंढरपूर येथील विठूमाउली, कोल्हापूरची महालक्ष्मी यांचे दर्शन घेण्याची प्रचंड आस आहे. कराची येथे दालमोलकर परिवार आपली पोतराज परंपरा आजही सन्मानाने टिकवून आहे.
आम्ही इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने कराचीमध्ये शिवजयंती साजरी केली. महाराष्ट्रातील अनेक मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले, हिंगोलचे इतिहासकार सुभान अली यांनी आपल्या ओघवत्या वणीत छत्रपती शिवरायांचा इतिहास उलगडला. आपले शिवाजी महाराज हे इतक्या प्रचंड व्यक्तिमत्वाचे धनी होते हे ऐकून सर्वांचे हृदय अभिमानाने भरून आले. या पूर्वी त्यांना कधीही छत्रपती शिवरायांचा इतिहास ऐकण्याची संधी उपलब्ध झाली नाही.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या उत्तुंग कर्तुत्वाबद्दल आरती घारे यांनी माहिती दिली. प्रा. डॉ. नारायण टाक यांनीसुद्धा जेजुरीच्या खंडोबाविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. कोल्हापूर येथील डॉ. शरद गायकवाड यांनी कराची येथील पोतराज बंधावशी संवाद साधला आणि पोतराज समाजाबद्दल माहिती दिली.
कराचीत पहिल्यांदाच मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. आणि या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित होते. मराठी भाषा दिनी मराठीशी पिढ्यानपिढ्या संबंध नसलेल्या मराठी मुलांनी मराठी गाणी गायिली. त्यांचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा होता. माननीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एक प्रमाणपत्र पाठवून त्यांना शाबासकी दिली आणि त्यांचे कौतुक केले.
तसेच या ऑनलाईन क्लास मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी केल्या गेली. या कार्यक्रमाला सोनाली कुलकर्णी आणि खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुधा साठे,माधुरी पुराणिक, सीमा दाभाडकर, क्षमा पाटणकर, सौ. नरवणे, डॉ. सौ. शोभना देशमुख या ज्येष्ठ शिक्षिका मराठी भाषेचे धडे देण्याचे कार्य मोठ्या समरसपणे आणि मनापासून पार पाडत आहेत.