नगर -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पीग्रस्त जनावरांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर नगर जिल्ह्यात राज्यातील पहिले क्वारंटाइन सेंटर सुरू होणार आहे. पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील बळीराजा फाउंडेशनला लम्पी बाधित जनावरांसाठी स्वखर्चाने क्वारंटाइन सेंटर (विलगीकरण केंद्र) सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 मधील अटींनुसार ही परवानगी देण्यात आली आहे.
लम्पी बाधित जनावरांसाठी संस्थेचे विलगीकरण केंद्र फक्त नगर जिल्हयातील पशुधनासाठी राहील. जवळच्या किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातील बाधित जनावरे या केंद्रात दाखल करुन घेता येणार नाहीत. विलगीकरण केंद्रात दाखल झालेल्या जनावरांची माहिती संबंधित तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील. जनावरे लम्पी बाधित असल्याचे प्रमाणपत्र पशुधन विकास अधिकारी यांनी दिल्यानंतरच विलगीकरण केंद्रात प्रवेश देणे बंधनकारक राहील.
तसेच प्रत्येक जनावरास ओळख बॅच देणे आवश्यक राहील. प्रत्येक जनावरासाठी रोज किमान 3 किलो कोरडा चारा व 9 किलो ओला/हिरवा चारा अर्धा किलो उच्च प्रतीचे किमान 20 टक्के प्रथिने असलेले पशुखाद्य देणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्येक जनावराला किमान 40 लीटर स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी संस्थेची राहील. विलगीकरण केंद्राचे दररोज निर्जंतुकीकरण व धुरीकरण करणे बंधनकारक राहील.