मुंबई – एकीकडे शिवसेनेचे आमदार आणि खासदार बंड उभारून पक्ष नेतृत्वाला आव्हान देताना दिसतायेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांपुढे न झुकता राजीनाम्याची तयारी सुरु केली असल्याचं चित्र आहे. शिवसेना नेते संजय राऊत मात्र अद्यापही हे बंड मोडून पडेल, आमचे आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. हे सरकार मजबूत स्थितीत असल्याचं संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.
बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना समोर या तुमची नाराजी बोलून दाखवा मुख्यमंत्री काय पक्षप्रमुख पद देखील सोडतो अशी भावनिक साद घातली. मुख्यमंत्र्यांच्या या भावनिक आवाहनाने बंडखोर आमदार तर परत आले नाहीत मात्र मुंबईत असलेले त्यांचे काही आमदार शिंदेंना जाऊन मिळाले. आमदारांचे बंड कसे शमवावे असा प्रश्न पक्षासमोर असतानाच सेना खासदार देखील फुटले असल्याचे वृत्त आहे.
या सर्व वादळी राजकीय घडामोडी घडत असताना संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडी व शिवसेना मजबूत स्थितीत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आमचे २० आमदार आमच्या संपर्कात आहेत. मुंबईत आल्यानंतर आमदारांना कोइंट्या दबावाखाली पाळबुन नेण्यात आलं हे समोर येईल. जो ईडीच्या दबावाखाली पक्ष सोडतो तो कसला बाळासाहेबांचा भक्त? असा प्रश्न देखील राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजपची शिंदे गटाला मोठी ऑफर
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड उभारलेल्या सेना आमदारांनी सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांच्यापुढे काँग्रेस, राष्ट्र्वादीसोबतची आघाडी तोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची प्रमुख अट घातली आहे. मात्र भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा बंडखोरांचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना अजिबात मान्य नसल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या काळाच्या भाषणाचा रोख पाहता पद गेलं तरी ते बंडखोरांची भाजपोसोबत जाण्याची मागणी पूर्ण करणार नसल्याचं स्पष्ट दिसतंय. अशातच भाजपने शिंदे गटासोबत वाटाघाटीस सुरुवात केल्याचं वृत्त आहे.
शिंदे गटातील आमदारांना राज्य मंत्रिमंडळात चांगली संधी तर केंद्रात समर्थक खासदारांना दोन मंत्रिपदं देण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला असल्याची माहिती सुत्रांकरवी मिळाली आहे. भाजपच्या या ऑफरनंतर शिंदे गटामध्ये वेगवान हालचाली सुरु झाल्याचं समजतंय.
आज भी हमारी पार्टी मजबूत है। किस हालात और किस दबाव में उन लोगों ने हमारा साथ छोड़ा उसका खुलासा जल्द होगा… हमारे संपर्क में लगभग 20 विधायक हैं और जब वे मुंबई आएंगे तब इसका खुलासा होगा। जो ED के दबाव में पार्टी छोड़ता है वह बालासाहेब का भक्त नहीं हो सकता: शिवसेना नेता संजय राउत pic.twitter.com/HlwnX8UYXK
— ANI_HindiNews (@AHindinews) June 23, 2022