नागपूर: राज्यात सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईत असल्याने सद्यस्थितीत मुंबई असुरक्षित आहे. अशा स्थितीत मुंबईतून राज्याचा कारभार चालवणे अवघड आहे. त्यामुळे राज्य सरकारचे कामकाज नागपुरातून चालवावे, अशी मागणी कॉंग्रेस नेते आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे. नागपुरात करोना नियंत्रणात असल्याने याचा सरकारला लाभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आशिष देशमुख म्हणाले, करोनामुळे मुंबईतील स्थिती भयावह आहे. मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईतून महाराष्ट्र सरकाराचा कारभार चालवू शकणे कठीण आहे. त्यामुळे सरकारचे कामकाज नागपुरातून सुरु व्हावे. नागपूर सुसज्ज आहे, उपराजधानीचं शहर आहे. एकेकाळी नागपूर मध्य प्रदेशाची राजधानी होती. नागपुरात करोना रिकव्हरी रेट चांगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ राज्य सरकार नागपुरातून चालवण्यासाठी प्रयत्न करावे. मुंबई असुरक्षित झाल्याने शासन नागपुरातून चालवावे, असे ते म्हणाले.
नागपूर सुसज्ज आहे. इथे मुख्यमंत्री कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सर्व काही उपलब्ध आहेत. त्यामुळे जे सरकार चालवण्यासाठी आवश्यक आहे ते नागपुरात उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.