मुंबई – राज्यात आज 9,361 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9,101 करोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के एवढे झाले आहे.
आतापर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या एकूण 57,19,457 इतकी झाली आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के इतका आहे. राज्यात सध्या 1 लाख 32 हजार 241 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. राज्यात काही दिवसात करोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे.
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 95 लाख 14 हजार 858 जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 59 लाख 72 हजार 781 जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या राज्यात 7 लाख 96 हजार 297 जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 4 हजार 683 जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूरमध्येही करोना रुग्णांच्या संख्या कमी होत आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 733 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 650 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 6 लाख 88 हजार 990 जणांनी करोनावर मात केली आहे.
मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या मुंबईत 14 हजार 809 करोना रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा दर 726 दिवसांवर पोहोचला आहे. 13 जून ते 19 जूनपर्यंत करोना वाढीचा दर हा 0.09 टक्के इतका होता. ठाण्यात 13,881 रुग्ण, पालघरमध्ये 1,604 रुग्ण, नाशिकमध्ये 4,636, नागपूरमध्ये 4,353, औरंगाबादमध्ये 2,050 करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.