मुंबई – राज्यात करोना विषाणूने हाहाकार माजवला होता. मात्र सध्या नवीन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. तसेच रिकव्हरी रेटही वाढत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आता राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू केली आहे. अनलाॅकबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केलीय. राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलाॅक होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
“सध्याच्या परिस्थितीत पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे. या पाच टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण 43 भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
त्यानुसार, उद्यापासून पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे उठणार असून सर्व दुकाने, उद्याने, थिएटर्स, सलून असं सगळं उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, नाशिक, परभणी, जालना, लातूर, यवतमाळ, वर्धा, धुळे, वाशिम, जळगावचा समावेश आहे.
राज्यातील अनलॉकचे पाच टप्पे पुढीलप्रमाणे:
पहिला टप्पा – सर्व निर्बंध उठवणार
दुसरा टप्पा – मर्यादित स्वरूपात निर्बंध उठवणार
तिसरा टप्पा – काही निर्बंधांसह अनलॉक
चौथा टप्पा – निर्बंध कायम
पाचवा टप्पा – रेड झोन. कडक लॉकडाऊन