अभ्यासक संस्थांचा अहवाल; जैवविविधतेच्या दृष्टीने चांगली बाब
पुणे – देशातील रानकुत्र्यांच्या संवर्धनासाठी चांगली कामगिरी निभावणाऱ्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात शेकडोंच्या संख्येने रानकुत्र्यांचा अधिवास असून जैवविविधतेच्या दृष्टीने ही एक चांगली बाब असल्याची नोंद एका अहवालात करण्यात आली आहे.
भारतातीत वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटी, वाइल्डलाइफ कन्झर्वेशन ट्रस्ट, युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा आणि द नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स या संस्थांमधील अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासावर आधारित “अ स्ट्रॅटेजिक रोडमॅप फॉर कन्झर्व्हिंग ढोले कुआन अल्पिनस इन इंडिया’ हा शोधनिबंध सादर केला आहे. यासाठी राज्यानुसार या प्राण्यांच्या संवर्धनाबाबत अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासानुसार, महाराष्ट्रात पश्चिम घाटात परिसरात विकास प्रकल्पांचे प्रमाण कमी असल्याने या प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहिल्याचे अभ्यासात सांगण्यात आले आहे. तर विकास प्रकल्पांना पर्यावरण आणि वनविभागाकडून देण्यात आलेल्या जलद परवानगीमुळ झालेल्या वृक्षतोडीतून अरुणाचल प्रदेश, ओडीसा, गोवा आणि तेलंगणा या राज्यांमधील रानकुत्र्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचेही अभ्यासात सांगण्यात आले आहे.
रानकुत्र्यांच्या संवर्धनासाठी रानकुत्र्यांची गणना, त्यांच्या अधिवासाचे संरक्षण आणि शास्त्रीय देखरेख या गोष्टींची आवश्यकता आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ओळख रानकुत्र्याची…
भारतामध्ये श्वानकुळातले रानकुत्रा, लांडगा, कोल्हा आणि खोकड असे चार प्रकारचे प्राणी आहेत. त्यात रानकुत्रा आणि लांडगा यांची समाजरचना एकसारखी असते. मात्र लांडगे उघड्या माळावर राहतात तर रानकुत्री दाट जंगलात राहतात. क्रुर शिकारी अशी ओळख असलेली रानकुत्री कळप करुन राहतात. त्यांची उंची पावणेदोन फूट तर लांबी तीन फूट असते तर एक-दीड फुटांची झुपकेदार शेपटी असते. रानकुत्रा हा प्राणी संरक्षित प्रजाती (शेड्युल 2) या प्रकारात समाविष्ट आहे.