मुंबई, दि. 9 – महाराष्ट्राच्या सर्वदूर भागात शिक्षणाचा मोठा प्रसार करून लोकसेवेचा मोठा आदर्श निर्माण करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारत सरकारकडे केली आहे. या संबंधात त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहीले आहे.
कर्मवीरांना रयत शिक्षण संस्थेंची स्थापना करून उपेक्षित समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. या संस्थेच्या शताब्दीचा कार्यक्रम 2019 साली झाला. त्यांना भारत रत्न पुरस्कार बहाल केला गेला तर तो त्यांच्या कार्याचा सार्थ गौरव ठरेल असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांनी ही मागणी करणारे पत्र सन 2018 मध्येही मोदी सरकारला लिहिले होते. या मागणीचा विचार व्हावा असे ट्विटही त्यांनी केले असून त्यात त्यांनी पंतप्रधान मोदींना टॅग केले आहे.