सांगली – महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन 26 आणि 27 जानेवारी रोजी सांगलीतील “शांतिनिकेतन’ या ठिकाणी होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन जलसिंचनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते तर कामगार व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषी व सहकारमंत्री विश्वजित कदम, खासदार संजयकाका पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस बालाजी पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष गोरख भिलारे, पश्चिम विभाग उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी, संघटन सचिव रघुनाथ कांबळे, संचालक मारुती नवलाई, आण्णा गुंडे, राजेंद्र माळी, विकास पवार आदी उपस्थित होते.
या अधिवेशनात राज्यातून दीड ते दोन हजारांहून अधिक वृत्तपत्र विक्रेते सहभागी होणार असून यात संघटनात्मक बांधणी, आमसभा, परिसंवाद, सायकल रॅली, वृत्तपत्र दिंडी, स्मरणिका प्रकाशन आदी कार्यक्रमांबरोबर वृत्तपत्र व्यवसायाची आजची स्थिती, सध्याची आव्हाने, भविष्यातील धोरण याबाबत चर्चा होणार आहे. श्री. पवार म्हणाले, “”राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही वृत्तपत्र विक्रेत्यांची राज्यातील एकमेव शिखर संघटना आहे. असंघटित क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेता हा घटक संघटित करुन त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचे काम ही संघटना करीत आहे.
महाराष्ट्रात तीन लाख कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. उन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता प्रामाणिकपणे काम करीत आहेत, ही एक सेवाच असून समाजात जागृती करणे, वाचन चळवळ वाढवणे अशा विविध क्षेत्रांत त्यांचे महत्वाचे योगदान आहे.
संघटनेची आमसभा 26 जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. तर 27 जानेवारी रोजी सकाळी अधिवेशनाचे उद्घाटन जयंत पाटील, बच्चू कडू यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार संजय केळकर, माजी मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सांवत, आमदार सुमन पाटील, मनीष पुराणिक, सहाय्यक कामगार आयुक्त तथा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी योजना अमंलबजावणीकरीता समिती अध्यक्षा सुनीता म्हैसकर, राज्य वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनाच्या तयारीसाठी जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, संघटक सचिन चोपडे, कार्याध्यक्ष शिवाजी काकडे, सरचिटणीस विकाल रासमकर, मनपा क्षेत्र अध्यक्ष दत्तात्रय सरगर, शहराध्यक्ष अमोल साबळे, मिरज शहराध्यक्ष रामा कुंभार, देवानंद वसगडे, चंद्रकांत जोशी, नागेश कोरे, दीपक वाघमारे, सागर घोरपडे, संदीप गवळी, विनायक तांबोळकर, अनिल रुपनर, सचिन माळी, आर.एस.माने,सुरेश कांबळे, बाळासाहेब पोरे, प्रशांत सांळुखे, कमलाकर भांबुरे, सुरेश धोत्रे, अधिक माळी, अनिकेत गंभीर, गणेश कटगी, सुभाष जाधव, राजेंद्र पोटे, मच्छिंद्र रासमकर, नीलेश कोष्टी, प्रताप दुधारे,प्रदीप आसगांवकर, रमेश सुतार, सुनील कट्ट्याप्पा, प्रकाश उन्हाळे, बाळू पाटील, विमल काळोखे, अलका पाटील, तानाजी जाधव, महारुद्र कुंभार, पोपट घोरपडे, बापू पवार, आप्पासाहेब बोंगाणे,शिवाजी जाधव, हणमंत जाधव आदी प्रयत्न करीत आहेत.
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ आवश्यक
आम्ही गेली पंधरा वर्षे असंघटित वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळाची मागणी करीत आहोत. मात्र, शासन यास प्रतिसादच देत नाही. मागील सरकारच्या काळात असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना करण्यात आली, यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करण्यात आला. यासाठी अभ्यास समितीने 11 नोव्हेंबर 2019 रोजी अहवालही दिला. हा अहवाल स्वीकारण्याची प्रतीक्षा आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले. मात्र, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ आवश्यक आहे, पेन्शन, आरोग्य, शैक्षणिक अशा सर्व योजना वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राबवा, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करावा, अशा अनेक मागण्या आहेत.