गडचिरोली – नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस जवानांची उमेद वाढविली. देशमुख यांनी शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गडचिरोलीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी आरतीताई हेलीकॉप्टरने पातागुडम येथे पोहोचले. यावेळी गडचिरोलीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सिरोंचा विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत स्वामी उपस्थित होते.
दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच गृहमंत्री येत असल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलिसांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलीस घरापासून, आपल्या आई-वडिलांपासून, भावंडांपासून, पत्नी-मुलाबाळापासून दूर असाल, याची आपल्याला जाणीव आहे. तेव्हा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून तुमच्यात यायला हवे, असे वाटते होते, असे देशमुख यांनी सांगितले.
या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था बराकमध्ये केली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत राहता येत नाही. हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले. पोलिसांच्या इतर अडचणी समूजन घेत सरकार सदैव पोलीस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही देशमुख यांनी दिली.
गडचिरोलीतील अत्यंत दुर्गम आणि टेकड्यांचा प्रदेश असलेल्या पातागुडम येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या ऐतिहासिक भेटीने पोलीस कर्मचारी भारावून गेले. येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची देशमुख दाम्पत्यांने आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.