मुंबई – महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दररोज सरासरी ५० हजार रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र येत्या रविवारी (ता. 11) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. या परीक्षेला राज्यात ४ लाखाहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. मात्र करोनाची स्थिती पाहता या परीक्षेवरून संभ्रम निर्माण झाला आहे. सरकार परीक्षा घेण्यावर ठाम आहे. मात्र या निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी मागणी आता करण्यात आली आहे.
अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहीजण दुखणे अंगावर काढत आहेत. परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे. मात्र, अद्याप सरकारकडून यासंदर्भात कुठलेही स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळे, सगळीकडे संभ्रम असून हा संभ्रम दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह काही नेत्यांकडून होत आहे. माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात मागणी केली आहे.
११ एप्रिल रोजी होणाऱ्या MPSC परीक्षेचा राज्य सरकारने फेरविचार करावा.काही विद्यार्थी कोरोना बाधित आहेत तसेच काही जिल्ह्यांमध्ये Lockdown आहे.त्यामुळे मा.मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा.@OfficeofUT @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
— Narendra Patil (@NarendraMathadi) April 7, 2021
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी 11 एप्रिलच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे. पाटील यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.
पुण्यात करोनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक विद्यार्थी करोनाबाधित आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आहे