पुणे – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही मागासवर्गीय आयोगाची निर्मिती केली. यामुळे मराठा समाज मागास असल्याचे निश्चित होऊन हे आरक्षण उच्च न्यायायत टिकले. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी राज्य शासनाने कोणतीही तयारी केलेली नाही. हे पाहता या सरकारमधील काही लोकांचा मराठा आरक्षणाला तात्विक विरोध आहे, असा थेट आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच कायमस्वरूपी आरक्षणासाठी सरकारने ठोस पणे बाजू मांडावी, मराठा आरक्षणात राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून, आरक्षणाबाबत राज्य सरकारने आपली बाजू मांडावी, असा आदेश दिला आहे. त्यावर दि.17 मार्चला सुनावणी होणार आहे.
“न्यायालयाचा आदेश हा मराठा समाजाला न्याय देणार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे. त्यामुळे पुढील सुनावणीदरम्यान सरकारने चांगली बाजू मांडावी. आधीच्या राज्य सरकारने भक्कम बाजू मांडली होती. त्यासाठी तेवढ्या ताकदीचे वकिलही नेमले होते. या मुद्यावरून राजकारण करून. अशा घटनांमध्ये विरोधकांना एकत्र घेतले पाहिजे,’ असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.