पिंपरी – भविष्यामध्ये आदिवासींच्या बाबतीत प्रश्न घेऊन संघर्ष केला पाहिजे. गावोगावी यात्रांचे आयोजन करून समाजाचे प्रबोधन केले पाहिजे. न्याय मिळविण्यासाठी आणि सरकारला जागे करण्यासाठी मोर्चे काढले पाहिजेत कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भोसरी येथील आयोजित अनूसूचित जमाती मोर्चाच्या महामेळाव्यात केला.
पिंपरी-चिंचवड भाजप अनुसूचित जमाती/ आदिवासी मोर्चाच्या वतीने आज प्रदेश पदाधिकारी, कार्य समिती बैठक व मेळाव्याचे आयोजन केले होते. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यात पाटील बोलत होते. यावेळी महापौर माई ढोरे, भाजपा प्रदेश प्रभारी ओमप्रकाश धुर्वे, माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, भाजपा प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, तुम्ही आंदोलन केल्याशिवाय हे सरकार कोणतीही गोष्ट मान्य करणार नाही. करोनाच्या काळात वाढीव वीज बिलाबाबत मोठे आंदोलन करावे लागले हे एक उदाहरण आहे. सरकारी योजनांच्या बाबतीत मोठा गोंधळ सुरू आहे. आदिवासी बांधवांच्या माध्यमातून एका ट्रस्टची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यामधून आदिवासी मुलींच्या आरोग्याची आणि शिक्षणाची जबाबदारी उचलता येईल.
भाजप सरकारच्या काळात दोन योजना आदिवासी बांधवांसाठी महत्त्वाच्या केल्या. मात्र त्या योजना आता बंद होत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील मोठ्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी योजना सुरू केली. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात ती योजना क्षीण होत चालली आहे. दुसरी योजना म्हणजे जमिनीचे पट्टे आदिवासी बांधवाना मिळणे. याबाबत कायदा झाला होता.
मात्र उपलब्धी काहीच नव्हती. त्याबाबात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून वनपट्टे आदिवासी बांधवाना दिले. मात्र सद्यस्थितीत आदिवासी बांधवांच्या योजनेकडे महाविकास आघाडीचे सरकार दुर्लक्ष करत असल्याच आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.